केंद्राकडे माहिती पाठवण्याची औपचारिकताच
पुणे –राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) राज्यात उत्सवांदरम्यान विविध प्रकारच्या प्रदूषणांची नोंद घेतली जाते. मात्र, या नोंदी केवळ कागदोपत्रीच होत असून, त्यापुढे प्रदूषण नियंत्रणासाठी काहीच कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उत्सव काळातील प्रदूषण नोंदी ही केवळ औपचारिकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांच्या काळात हवा, जल, ध्वनी प्रदूषणाच्या नोंदी प्रामुख्याने घेतल्या जातात. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मार्गदर्शक सूचनांनुसार “एमपीसीबी’ प्रशासन या नोंदी घेते. या नोंदींचा अहवाल “सीपीसीबी’कडे पाठवला जातो. मंडळाच्या नोंदीनुसार, “अलिकडील काळात उत्सवादरम्यान सर्वच प्रकारच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून, प्रदूषणकारी घटक प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रदूषणकारी घटकांवर नियंत्रण आणणे आणि त्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहेत. मात्र, उत्सव कालावधीतील प्रदूषणवाढीसंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही,’ अशी माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
याबाबत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. जे. बी. सांगेवार म्हणाले, “मंडळातर्फे दिवाळी, गणेशोत्सवादरम्यान शहरात विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणी, नदीच्या पाण्याचे नमुने गोळा करून त्याची तपासणी तसेच ध्वनी प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जातात. त्यांचा अहवाल मंडळाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात येतो. मात्र, अद्यापर्यंत या नोंदींच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.’