शरद पवार आणि निवडणूक यांचं एक वेगळेच समीकरण गेल्या सहा दशकांत तयार झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात वर्ष 1960 मध्ये स. गो. बर्वे यांच्या प्रचारात सक्रिय झालेले शरद पवार वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही किंगमेकर ठरले.
बीएमसीसी महाविद्यालात शिकत असताना त्यांचे उपप्राचार्य पी. व्ही. पटवर्धन सर यांनी पवार आणि त्यांच्या मित्रमंडळींना स. गो. बर्वे यांच्या प्रचाराची विनंती केली. त्यांनी ती शिरोधार्य मानली. रामभाऊ म्हाळगी यांच्याविरुद्धची ही निवडणूक स. गो. बर्वे यांनी जिंकली.
वर्ष 1961 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी भारतीय जवानांना पाठींबा देण्यासाठी पुण्यात मोर्चा काढायचे शरद पवार यांनी ठरवले. सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यावरून शनिवारवाड्यावर पोहोचला. या मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतरच शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या नजरेत भरले. त्यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील निवडणुका आणि पवार यांचे एक अतूट समीकरण निर्माण झाले.
कोणत्याही विपरित परिस्थितीत निवडणूक कशी जिंकायची हे पवार यांनी दाखवून दिले. गीतकार पी. सावळाराम यांना ठाण्याचे नगराध्यक्ष बनवायचे, असे यशवंतराव चव्हाण यांनी ठरवले. शरद पवार यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. दोन मते बहुमतासाठी कमी होती. पण पवार पॅटर्न कामी आला.नगराध्यक्ष झालेल्या पी. सावळाराम यांना घेऊन पवार यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले. त्यावेळी ग. दि. माडगूळकर तेथे होते. त्यांनी कोटी केली. येड्याचा पाटील ठाण्याचा नगराध्यक्ष झाला. पी. सावळाराम यांचे गाव येडे मच्छिंद्र त्यावरून केलेली ही कोटी.
नासिकराव तिरपुडे हे यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. फारसा जनाधार नसतानाही ते दिल्लीश्वरांच्या आशीर्वादावर यशवंतराव चव्हाणांचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असत. यशवंतराव चव्हाण यांच्या सोज्वळ राजकारणाचे भक्त असणाऱ्या पवार, किसन वीर यासारख्या दिग्गजांना हा आगाऊपणा सहन होणे शक्यच नव्हते. त्यातून ते बाहेर पडले. पुलोद सरकार स्थापन झाले. त्यानंतर पवार यांचे बहुतांश सहकारी कॉंग्रेसमध्ये परत गेले. त्यावेळी पुन्हा एकदा राज्य पिंजून काढत त्यांनी आधीपेक्षा अधिक आमदार निवडून आणले. त्यावेळी दादांच्या पाठीत खंजिर खुपसल्याची टीका होऊ लागली. मात्र, पवार यांनी या आरोपांना उत्तर आपल्या कृतीतून दिले.
शिवसेनेच्या वाढीसाठी सर्वात अधिक योगदान देणाऱ्या छगन भुजबळ यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिला. त्यावेळी शिवसेना सोडणाऱ्यांचा खोपकरफ होतो, असा दबदबा होता. पण भुजबळ यांना मंत्रिपद देत, महाराष्ट्राच्या सभ्य राजकारणाचा वसा पवार यांनी जपला. एवढेच नव्हे तर, राज्याच्या राजकारणात दहशतीला फार स्थान नाही. हेही या निमित्ताने अधोरेखीत केले.
राजकारण आपल्या जागी आणि व्यक्तीगत सेक्ह आपल्या जागी. त्यात सभ्य आणि अभ्यासू नेत्यांविषयी पवार यांच्या मनात ममत्व असे. उत्तर महाराष्ट्रातील एक भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या छायेत होते. पवार यांच्याकडे मदतीची याचना त्यांनी केली. त्या गावात पवार यांची सभा होती. त्यांनी गावात जाणाऱ्या फाट्यावर या नेत्याला भेटायला बोलावले. त्यातून जायचा तो योग्य संदेश गेला. हा विरोधकही निवडून आला. अर्थात नंतर हेच विरोधक पवार यांच्यावर व्यक्तीगत स्वरूपाची टीका करण्यात धन्यता मानू लागले.
पवार यांच्या राजकीय जीवनातील सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजेच वर्ष 2019 ची विधानसभा निवडणूक. जवळचे समजले जाणारे सारे जण भाजपच्या वाटेवर गेलेले. त्यातून पक्ष उभा करणे आणि धर्मनिरपेक्षतेचा विचार जिवंत ठेवणे, असे दुहेरी आव्हान होते. ज्येष्ठांना या विचारांचा विसर पडला हे लक्षात आले तेव्हा तरुणांना हाताशी धरून या 80 वर्षांच्या तरुणाने ही निवडणूक हाती घेतली.
उस्मानाबाद येथील मेळाव्यापासून प्रचाराचा झंझावात सुरू केला. साताऱ्यातील पावसात झालेल्या सभेने त्यावर कळसाध्याय लिहिला गेला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात त्यांनी सत्तेची सारी समीकरणे बदलून टाकली.
राजकीय समीकरणे जुळवत असताना साहित्यिक, कलाकार आणि विद्वजनांचा सन्मान ठेवण्याचे भान पवार यांनी आयुष्यभर सांभाळले. हे भान फार कमी जणांकडे आहे. म्हणून राज्यातील राजकारणातील हे चांदणे असेच चमचमत रहावे हीच शुभेच्छा.