नवी दिल्ली – दिवसागणिक करोनाबाधित आणि बळींच्या संख्येत मोठी भर पडत असली तरी बऱ्या होणाऱ्या रूग्णांचे वाढते प्रमाण देशासाठी आशादायी ठरत आहे. देशातील एकूण बाधित संख्येत सक्रिय बाधितांचे प्रमाण केवळ एक-तृतीयांशपेक्षा थोडेफार अधिक आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 3 लाख 31 हजार 146 सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत सुमारे 6 लाख 13 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. देशातील बऱ्या होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण 63.25 टक्के इतके झाले आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून अधिक बाधित करोनामुक्त झाले.
जून महिन्याच्या मध्यात देशातील सक्रिय बाधितांचे प्रमाण 45 टक्क्यांच्या आसपास होते. ते आता घटून 34.18 टक्के इतके झाले आहे. महाराष्ट्र आणि तामीळनाडू या दोन राज्यांत देशातील जवळपास निम्मे म्हणजे 48.15 टक्के सक्रिय बाधित आहेत. तर, महाराष्ट्र आणि तामीळनाडूसह 10 राज्यांतील ते प्रमाण तब्बल 84.62 टक्के इतके आहे.