पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह ः खुनाच्या घटनेला स्वस्त सोन्याचीच किनार
नगर (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे गुरुवारी (दि.20) झालेल्या चार जणांच्या हत्याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने मंगळवारी (दि.25) चौघांना अटक केली. कल्पना किशोर सपकाळे, आशा जगदीश सोनवणे, प्रेमराज रमेश पाटील, योगेश मोहन ठाकूर (सर्व रा. हरी विठ्ठलनगर, जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात सोमवारी (दि.24) नरेश जगदीश सोनवणे (वय- 22, रा. हरी विठ्ठलनगर, जि. जळगाव) याला अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी सायंकाळी चार वाजता विसापूर फाटा येथे नतिक कुंज्या चव्हाण, श्रीधर कुंज्या चव्हाण, नागेश कुंज्या चव्हाण, लिंब्या हाबऱ्या काळे या चौघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आक्षता कुंजीलाल चव्हाण (वय 60, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) हिने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा, श्रीगोंदा व बेलवंडी पोलिसांची वेगवेगळी पथके नियुक्त केली. स्वस्तात सोने खरेदीवरून हे हत्याकांड झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हत्या करणारे जळगाव शहरातील असल्याची महिती पोलिसांना मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नगरच्या पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असात, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
मयत व त्यांच्या इतर साथीदारांनी एक महिन्यापूर्वी जळगाव येथील एक महिला व दोन पुरुषांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले होते. सुरुवातीला चार लाख रुपयांमध्ये 250 ग्रॅम सोने देण्यासाठी जळगाव येथील महिला व तिच्या इतर साथीदारांना गुरुवारी विसापूर फाटा येथे बोलावून घेतले होते. विसापूर फाटा येथील एका शेतामध्ये आरोपी व मयत यांच्यामध्ये व्यवहार सुरू होता.
आरोपी कल्पना सपकाळे हिने मयत व त्यांच्या सोबतच्या इतर साथीदारांना दोन लाख 95 हजार रुपये मोजून दिले. यावेळी मयतांनी देऊन टाका, देऊन टाका, असे म्हणताच शेतामध्ये दबा धरून बसलेल्या मयतांच्या इतर साथीदारांनी कल्पना सपकाळे व त्यांच्या साथीदारांवर हल्ला केला. यावेळी कल्पना सपकाळे यांची पर्स, मोबाईल, दागिने हल्लेखोरांनी काढून घेतले. यावेळी सपकाळे यांच्या सोबत आलेल्या एकाने धारदार शस्त्राने हल्ला करून चौघांची हत्या केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.