सोरतापवाडी -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी येथील (स्व) आण्णासाहेब मगर उपबाजार हा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासक बी. जे. देशमुख यांनी जाहीर केला. येथील बाजार समिती गेल्या 8 दिवसांपासून उपबाजारात गर्दी होऊ नये, यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवून शेतकरी, व्यापारी, विक्रेते व किरकोळ खरेदीदार यांच्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवित आहेत.
परंतु सर्वसामान्य याबाबतीत कोणतीही काळजी न घेता मोठया संख्येने एकत्र येत आहेत. संक्रमणाचा धोका वाढू लागलेला आहे. त्यामुळे करोना हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे व त्याची तीव्रता महाभयंकर असल्यामुळे व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी, व्यापारी, टेम्पो संघटना, हमाल पंचायत, आडते असोसिएशन, भारतीय किसान संघ व संबंधित घटकांची बैठक सहायक सचिव राम घाडगे व विभाग प्रमुख दिलीप घावटे व संबंधित घटक यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी संबंधित घटकांनी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय राम घाडगे व दिलीप घावटे यांना सांगितला. त्यांनी बी. जे. देशमुख यांच्याबरोबर चर्चा करून बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देशमुख यांनी दिला. बाजारात तीन जिल्ह्यांतील माल येत असतो. त्यामुळे गर्दीचे प्रमाण जादा आहे.
कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणीही आपला माल आणू नये. त्यासाठी आम्ही आपणांस पर्याय सुचवित आहोत. परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीमालाची खरेदी करावी. खरेदी केलेला माल सुनसान रस्त्यावर किंवा सोसायट्यांमध्ये वाडी- वस्तीवर जाऊन विकावा. जेणेकरून कोणतीही गर्दी न होता नये.
– राजन तुपे,
अध्यक्ष, भारतीय किसान संघ.