नवी दिल्ली – कॉंग्रेस आता राष्ट्रीय, भारतीय आणि लोकशाहीवादी पक्ष राहिलेला नाही तर कॉंग्रेस आता केवळ भाऊ आणि बहिणीचा पक्ष झाला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच अंतर्गत लोकशाही असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा या सगळ्यांच राज्यात घराणेशाहीवर चालणारे राजकीय पक्ष असल्याचा आरोप नड्डा यांनी केला.
नड्डा नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. घराणेशाहीवर चालणाऱ्या राजकीय पक्षांचा लोकशाहीला धोका या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपली ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, घराणेशाहीवर चालणारे पक्ष एका व्यक्तीच्या हिताचा विचार करतात, असे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक असतात. या राजकीय पक्षांमध्ये जन्माच्या आधारावर संधी मिळते आणि इतरांना डावलले जाते. घराणेशाहीवर चालणाऱ्या राजकीय पक्षांचा उद्देश हा केवळ सत्ता हस्तगत करणे हा असतो, असा आरोपही नड्डा यांनी केला.
देशाच्या राजकारणात आज प्रादेशिक पक्षांच्या उदयाला आणि विस्ताराला कॉंग्रेसच जबाबदार असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, प्रमुख विरोधी पक्षाने राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रादेशिक प्रश्नांना वाव दिला नाही. भाजप विविधतेमध्ये एकतेला प्राधान्य देतो. प्रादेशिक अस्मितांना, प्रश्नांना योग्य प्रतिनिधीत्त्व देऊन राष्ट्रीय भावना मजूबत राहील याची दक्षता आमचा पक्ष घेतो, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.