नागपूर – रामनवमीसारखे महत्त्वाचे आणि पावन पर्व आपण “करोना’च्या भीषण सावटात साजरे केले आहे. प्रभू रामचंद्रांनी सर्व राक्षसी वृत्तींचा नाश केला. आज आपण एका वेगळ्या, पण भीषण संकटातून जात आहोत. संपूर्ण जग भयभीत आहे. “करोना’चा संसर्ग रोखणे, हे आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन केले, तरच आपण या संकटातून मुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे.
या संकटाच्या काळात देशाच्या प्रत्येक भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सेवाकार्य करीत आहेत. जसजशी आवश्यकता निर्माण होत आहे, त्याच्या पूर्ततेसाठी आज देशभरात हजारो स्वयंसेवक सेवाभावाच्या माध्यमातून या संकटात समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. आज सुमारे दहा हजार ठिकाणी एक लाखांवर स्वयंसेवक विभिन्न गरजांच्या पूर्तता करीत आहेत. या अंतर्गत सुमारे दहा लाख परिवारांपर्यंत संघाचे स्वयंसेवक वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचले आहेत. याशिवाय, एक लाखांपेक्षा जास्त स्वयंसेवक वेगवेगळ्या सेवाकार्य आणि सामाजिक जागृतीच्या कार्यात सक्रिय आहेत. विशेषत: अन्नधान्य आणि सॅनिटायझर्ससारख्या उपयुक्त वस्तूंचा पुरवठा करणे, रुग्णालयांमध्ये जाऊन सेवा देणे, यासारख्या कामांमध्ये त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे, अशी माहितीही भय्याजींनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भटक्या-विमुक्तांच्या वस्त्या आहेत. संघाच्या स्वयंसेवकांनी अशाच काही वस्त्यांमध्ये जाऊन, त्यांच्यासाठी जेवण व इतर आवश्यक सेवा उपलब्ध करणे सुरू केले आहे. आतापर्यंत एक हजार स्वयंसेवकांनी रक्तदान केले आहे. सुरक्षा कर्तव्यावर असलेले कर्मचारी, तसेच आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतरही कर्मचारी दिवस-रात्र परिश्रम करीत आहेत, तसेच समाजाला नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, अशा सर्व सेवेकऱ्यांनाही भोजन, अल्पाहार आदी आवश्यक सेवा पोहोचविण्याचे कार्य स्वयंसेवकांकडून केले जात आहे, असे भय्याजी म्हणाले.
कामगारांचे स्थलांतरण
आजच्या या संकटाच्या काळात परप्रांतीय कामगारांचे स्थलांतरण आणखीच घातक सिद्ध होऊ शकते. म्हणून समाज आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या गरजा आपण आहात तिथेच पूर्ण होतील, असा विश्वास या कामगारांच्या मनात निर्माण करण्यासाठी, आपण सर्वांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण त्यांच्या भेटी घेण्याची गरज आहे. अशा अनेक ठिकाणी जाऊन स्वयंसेवक आपले कार्य करीत आहेत, असेही भय्याजी जोशी म्हणाले.