अहमदाबाद : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली की सर्वत्र एक वेगळेच प्रसन्न करणारे वातावरण तयार होते. त्यात आता गरबा खेळण्याची चंगळ सुरू होणार त्याच पार्श्वभूमीवर बजरंग दलाने एक वेगळे आवाहन केले आहे. नवरात्रीचा उत्सव हे हिंदू महिलांना आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्याचे व्यासपीठ झाले असल्याचा दावा करून, गुजरातमधील गरबाच्या ठिकाणी गैरहिंदूंचा प्रवेश रोखावा, असे बजरंग दलाने गरबा नृत्याच्या आयोजकांना सांगितले आहे.
गरब्याच्या ठिकाणांच्या बाहेर सतत पहारा देण्यासाठी आणि लोकांना लव्ह जिहाद बाबत सतर्क करणारी भित्तिपत्रके लावण्यासाठी या हिंदुत्ववादी संघटनेने पथकेही स्थापन केली आहेत. अहमदाबादमध्ये सर्व मोठ्या गरबा कार्यक्रमस्थळी, विशेषत: मुस्लीमबहुल भागांजवळील स्थळी अशा प्रकारची पत्रके लावण्यात आली असल्याचे बजरंग दलाकडून सांगण्यात आले आहे. नवरात्रीच्या काळात गैरहिंदू लोकांतर्फे हिंदू समाजातील मुली व महिलांना लक्ष्य करण्याच्या कारस्थानाबाबत या भित्तिपत्रकांच्या माध्यमातून आम्ही समाजाला खबरदार करत आहोत. दरवर्षी तीन लाखांहून अधिक हिंदू मुली/ महिला या लव्ह जिहादच्या शिकार ठरतात, असा दावा मेहता यांनी केला. पालकांनी सतर्क राहून त्यांच्या मुलींना वाचवावे, असे आवाहनही या संघटनेने केले आहे.