बंगळूर -देशातील अनेक राज्यांना करोना संकटाने ग्रासले आहे. त्या संकटावर मात करण्यासाठी राज्यांना झुंजावे लागत आहे. अशातच केवळ ईश्वरच आपल्याला करोनापासून वाचवू शकतो, असे हतबल उद्गार कर्नाटकचे आरोग्य मंत्री बी.श्रीरामुलू यांनी काढले. मात्र, त्या वक्तव्यावरून वादंग निर्माण होत असल्याचे पाहून त्यांनी नंतर सारवासारव केली.
कर्नाटकमधील करोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे त्या राज्यातील भाजप सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. करोनाचा फैलाव रोखण्यात कर्नाटक सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, श्रीरामुलू यांनी बुधवारी हतबलता व्यक्त करणारे वक्तव्य केल्याने त्याला प्रसारमाध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली. त्यातून सरकारची गोची झाल्याने श्रीरामुलू यांनी गुरूवारी स्पष्टीकरण दिले.
माझ्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला. करोनावर लस उपलब्ध होईपर्यंत ईश्वरच आपल्याला वाचवू शकतो, असे मला म्हणायचे होते. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जनतेचे सहकार्यही महत्वाचे आहे. त्याशिवाय, ईश्वरानेही आपले रक्षण करावे, अशी माझ्या वक्तव्यामागची भावना होती, असे त्यांनी म्हटले.
हिमाचलचे मुख्यमंत्री झाले यज्ञात सहभागी
करोना संकट संपुष्टात यावे, असे साकडे ईश्वराला घालण्यासाठी हिमाचल प्रदेशात एका यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्या यज्ञात हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हेही सहभागी झाले. देशातील जनतेचा आपल्या संस्कृतीवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा एखादा पेचप्रसंग उद्भवतो, तेव्हा आपण ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी धार्मिक विधी करतो, अशी भावना भाजप नेते असणाऱ्या ठाकूर यांनी व्यक्त केली.