कराड – यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेणाऱ्या शरद पवारांनीच सहकारात गढ्या निर्माण करून गावगाड्यातील शेतकऱ्यांची लुट केली. परंतु, आज यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने सांगतो; यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दमदार नेतृत्व मिळाले असून फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करू शकतात. तेच त्यांच्या गढ्या, वाडे आणि लुटारूंचा बंदोबस्त करू शकतात. म्हणून पवारांच्या पोटात गोळा उठत असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.
येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून कराड ते सातारा पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. यादरम्यान, प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संवाध साधताना ते बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हाउपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी, बापूराव जगदाळे, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, साखर कारखानदारांचे नटसम्राट कोण आहेत? हे सर्वांना माहीत आहे. कारखानदार हे उंदरासारखे असून जहाज पुढे निघाल्यावर पहिल्यांदा तेच उडी मारतात आणि सरकार बुडायला लागल्यावर उडी मारणारी अवलादही साखर कारखानदारच आहेत. अशा गड्यांना पाडाव या सरकारने करावा. चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ आम्ही पाप धुवायला आलो नसून तुमची पिलावळे आम्हाला घर-घर करायला लावत असल्याचे सांगायला आलो आहोत. मंत्रिपद मिळवायला नव्हे; तर शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आलो आहोत. शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणारे केलेले कायदे संपुष्टात आणा, अशी आमची सरकारला मागणी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेचा समाचार घेताना खोत म्हणाले, केंद्र सरकारने दोन हजार रुपयांची नोटा मागे घेतल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. तसेच पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटही मागे घेण्यात याव्यात, असेही मी म्हटले होते. परंतु, ज्यांच्याकडे पोत्याने पैसा आहे. ज्यांच्याकडे काळा, दोन नंबरचा पैसा आहे, त्यांनाच या नोटबंदीमुळे पोटशूळ उठल्याचे दिसून येत आहे. पाचशे रुपयाच्या नोटा प्रस्थापितांकडे आणि शेतकऱ्यांचं खुळं लुटणाऱ्यांकडेच आहेत. या नोटांचा उपयोग फक्त लाच घेण्यासाठी आणि निवडणुकीत वाटण्यासाठी होत असल्याचा आरोप करत नोटा मागे घेतल्यावर अमोल मिटकरींच्या पोटात का दुखते? मुळात त्यांचा पक्ष हा सरदारांचा आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचा आहे. त्यामुळे ही थांबवण्यासाठी पदयात्रा काढत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, कराडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही पदयात्रा काढत असून या तीन दिवसात सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नाही; तर आम्ही वाहनांने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार असून त्याठिकाणी पुढचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी ऑनलाइन व्यवहार करू शकतो
हल्ली सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने गुगल, फोन पे वरून होत आहेत. गावगाड्यातील शेतकरी 50 रुपये, दहा रुपयांच्या नोटेतही व्यवहार करीत असतो. त्यांच्याकडे जादा पैसे आल्यास तो इतरांची देणी ऑनलाइन पद्धतीने देऊ शकतो. त्यामुळे नोटबंदीची भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांना नसून दोन नंबर, काळ्या पैसेवाल्यांनाच जास्त आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.