मुंबई : राज्यात एकीकडे करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना, आता राज्यासमोर आणखी एक नवे संकट निर्माण होत आहे. राज्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन देखील केले आहे.
राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील रक्त पुरवठा, पीपीई कीट, मास्क आदींची उपलब्धता जाणून घेण्यासाठी रक्त पेढी व पीपीई कीट्स-मास्क उत्पादकांबरोबर बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी राज्यातील रक्त तुटवड्याबाबत माहिती देत रक्तदानाचे आवाहन केले.
केवळ करोनाबाधितांवरील उपचारांसाठीच नाही, तर बाळांतपण, विविध शस्त्रक्रिया, कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांवरील उपाचारांमध्ये देखील रक्ताची मोठी निकड असते, त्यामुळे सर्वांना मोठ्याप्रमाणात रक्तदानासाठी पुढाकर घेण्याची आवश्यकता आहे. या साठी आपल्या जवळच्या रक्तपेढीत, रुग्णालयात किंवा सोसायटीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, राज्यातील रक्त साठ्याचा तुटवडा पाहता रक्तदात्यांची संपूर्ण सुरक्षितता राखून छोटी रक्तदान शिबिरंदेखील घ्यावीत, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.