मुंबई : राज्यभरातील करोनाची दुसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे.मुंबईतही आता करोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या लोकल ट्रेन संदर्भात आता चर्चा होताना दिसत आहे. मात्र मुंबई लोकल संदर्भात काही गोष्टी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याच मुद्यावरून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात देखील मोठी चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर परखड टीका करणं सुरू केलं असताना सामान्य मुंबईकर देखील त्यासंदर्भात मागणी करताना दिसत आहेत.
यातच आता राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांना तिकिट, मासिक पास मिळणे अवघड झाले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना देखील लोकलमधून प्रवास करता येत नसल्याचं दिसून येत आहे. खुद्द प्रशासनानंच रेल्वे विभागाला पाठवलेल्या पत्रामधून ही बाब समोर आली आहे.
या पत्रात लिहिले आहे की,’लोकलने प्रवास करण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं वैध ओळखपत्र असणं आवश्यक आहे. मात्र, असं दिसून आलं आहे की राज्य सरकारच्या अनेक कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र असून देखील लोकलमधून प्रवास करता येत नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र असेल, तर त्यांना मासिक पास दिला जावा’