मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजपाकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे अतोनात प्रयत्न सुरू आहे. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा या निवडणुकीत ‘घोडेबाजार’ करेल, असा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. याच घोडेबाजार या शब्दावरून भाजपा नेते किरीट सोमय्या शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात यावा अशी मागणी केली आहे.
“निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो करणारा, पाहणारा आणि होऊ देणारा हे सर्व जबाबदार आहेत. म्हणून आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या प्रवक्त्यांचा ताबडतोब जबाब नोंदवण्यात यावा. घोडेबाजार करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी,” असे किरीट सोमय्या म्हणाले.
“स्वतःच्या पक्षाचे, मित्रपक्षांचे आणि त्यांना समर्थन देणारे आमदार बिकाऊ आहेत असे उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते म्हणत आहेत. महाराष्ट्रात हे पहिल्यांदा घडत आहे. आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप हे फक्त गाढवच करु शकतो. मग अप्रामाणिक आमदार कोण आहेत?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
भाजपा याचे कधीच समर्थन करणार नाही. याविरुद्ध चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. पण हे जर खोटे असेल तर ते बोलणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असेही सोमय्या म्हणाले.