जिल्ह्यात आजपासून अंशतः अनलॉक
सातारा (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन रविवारी संपला. उद्यापासून दि. 27 ते 31 जुलै जिल्ह्यात अंशतः अनलॉक राहणार असून फक्त किराणा मालाची दुकाने सकाळी 9 ते 2 या वेळेत खुली राहणार आहेत.
जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दि.17 ते 22 पूर्णतः लॉकडाऊन आणि दि. 22 ते 26 अंशतः लॉकडाऊन शेखर सिंह यांनी जारी केला होता.
रविवारी रात्री 12 नंतर पुन्हा दि.9 जुलैच्या आदेशानुसार जिल्ह्यात कार्यवाही होणार असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. त्यानुसार उद्यापासून (दि. 27) जिल्ह्यातील फक्त किराणा मालाची दुकाने सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये सुरू राहणार असून इतर सर्व आस्थापना बंदच राहणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये संबंधित प्रांताधिकाऱ्यांचे आदेश लागू राहतील.
जिल्ह्यात लग्नविधी यासारख्या कार्यक्रमास जास्तीत जास्त 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करण्यास परवानगी असून यामध्ये या कार्यक्रमासाठी जिल्ह्याबाहेरील वधु,वर, वधु-वरांचे आई-वडील, सख्खे भाऊ-बहिण, सख्खे आजी-आजोबा यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. हे आदेश 31 जुलै पर्यंत लागू असणार आहेत.