औरंगाबाद – राज्याने करोना विरोधातील लसीसाठी जितकी मागणी नोंदवली होंती त्याच्या केवळ 60 टक्के प्रमाणातच महाराष्ट्राला लस मिळाली आहे असा तक्रारीचा सूर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लावला आहे.
ते म्हणाले की आम्हाला लसीचे 10 लाख डोस मिळाले असून उर्वरीत डोस पुढील दहा दिवसात मिळतील अशी आशा आहे. आज जालना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की या पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी किमान आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी नावे नोंदवली आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला आणखी अतिरीक्त साडे सात लाख डोस मिळणे आवश्यक आहे.
या आठ लाख लोकांना लस देण्यासाठी राज्याला लसीचे एकूण साडे सतरा लाख डोस मिळणे अपेक्षित आहे. त्यातील दहा लाख डोस आत्तापर्यंत राज्याला प्राप्त झाले आहेत.
उर्वरीत डोस त्वरीत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आपण लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे पत्राद्वारे करणार आहोत असेही त्यांनी नमूद केले. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनी ही लस बिनदिक्कत घ्यावी कारण ती पुर्ण सुरक्षित आहे अशी ग्वाहीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.