नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यामध्ये मारुती सुझुकी कंपनी आपल्या क्षमतेच्या केवळ 40 टक्के उत्पादन करणार आहे. त्यामुळे या महिन्यात क्षमतेच्या 60 टक्के उत्पादन होऊ शकणार नाही असे मारुती सुझुकी कंपनीने म्हटले आहे.
मारुतीच्या गुडगाव आणि मानेसर येथील प्रकल्पाची क्षमता वर्षाला 15 लाख कार तयार करण्याचे आहे. गल्या अनेक महिन्यापासून वाहन कंपन्यांना सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बहुतांश कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. लॉक डाऊनच्या काळामध्ये विविध क्षेत्रांमध्ये सेमीकंडक्टरचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर वाहन कंपन्यातही सेमीकंडक्टरचा वापर वाढला आहे.
मात्र सेमीकंडक्टरचे उत्पादन वाढलेले नाही. ही परिस्थिती पूर्ववत होण्यास बराच काळ लागेल असे समजले जात आहे. त्यामुळे वाहन कंपन्यांच्या आणि इतर कंपन्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
त्यामुळे भारत सरकारने सेमीकंडक्टरचे उत्पादन कंपन्यांनी घेतल्यास त्यांना चालना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. टाटा मोटर्स ही कंपनी या क्षेत्रात उत्पादन घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.