श्रीनगर : जम्मू काश्मीरातील दहशतवाद्यांची संख्या आता झपाट्याने कमी होत असून खोऱ्यात आता जेमतेम 250 दहशतवादी उरले आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात झालेल्या सुरक्षा दलांच्या मोहीमांमध्ये 25 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आज येथे दिली. ते म्हणाले की आमच्या माहितीनुसार यावर्षी आत्ता पर्यंत केवळ तीन दहशतवादी सीमा पार करून काश्मीर खोऱ्यात आले आहेत.
दहशतवाद्यांच्या विरोधात या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांच्या अवधीत ज्या एकूण बारा मोहीमा राबवण्यात आल्या त्यातील दहा मोहीमा काश्मीरात आणि दोन मोहीमा जम्मू भागात राबवण्यात आल्या. त्यात 25 दहशतवादी मारले गेले असून नऊ दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे असे ते म्हणाले. दहशतवादी व देश विरोधी घटकांकडून सोशल मिडीयाचाही मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात होता त्यावरही आता नियंत्रण मिळवण्यात आले आहे असे त्यांनी म्हटले आहे.