एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत उपक्रम
महात्मा फुले स्मारकात विविध विभागांनी सुरू केले होते कामकाज
कामशेत – कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2019-20 अंतर्गत मावळातील शेतकऱ्यांकडून हरितगृह, शेडनेट, कांदाचाळ, शीतवाहन आदी बाबींकरिता शासनामार्फत 22 एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार हरितगृहासाठी 192, शेडनेट- 2, कांदा चाळसाठी – 4, शीतवाहन -3, एकात्मिक पॅक हाउस – 5, पॉवरटिलर – 16, ट्रॅक्टर – 68, रायपनिंग चेंबर-1, अळंबी उत्पादन -1, लागवड साहित्य -29, अस्तरीकरण -15, सामूहिक शेततळे -2, मल्चिंग 02, शीतगृह 14, स्ट्रोबेरी लागवड 02, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन 2 आदी घटकांसाठी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या घटकांसाठी तालुक्यातील एकूण 357 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते.
या प्राप्त अर्जांची शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लॉटरी पद्धतीने घटनानिहाय प्रतीक्षा यादी तालुका कृषी विभागाकडून तयार करण्यात आली आहे. या अर्जांची सोडत मंगळवारी (दि. 18) कान्हेफाटा येथील साई सेवाधाम येथे शेतकऱ्यांच्या हस्ते पार पडली. या वेळी पंचायत समिती सभापती सुवर्णा कुंभार, कृषी अधीक्षक कार्यालयीन प्रतिनिधी बुचडे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, कृषी सहाय्यक किरण बोऱ्हाडे, दत्ता घोगरे व सर्व मंडळ कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे.