पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी 25 एप्रिल रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येणार आहे. याची अधिसूचना 9 मार्च रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाची सुविधाही तत्काळ उपलब्ध करून दिली होती. करोनामुळे शाळा बंद असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या नोंदणीला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.
आतापर्यंत 41 हजार 940 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. एकूण 4 लाख 53 हजार 893 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 2 लाख 66 हजार 252 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. यात 2 लाख 9 हजार 761 विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरण्याचीही प्रक्रिया पूर्ण केली.
56 हजार 491 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क भरलेले नाही. इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी एकूण 1 लाख 87 हजार 641 विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदविले. त्यातील 1 लाख 44 हजार 695 विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जमा झाले आहे. 42 हजार 946 विद्यार्थ्यांचे अजूनही बाकी आहेत. शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी 21 मार्चपर्यंतची मुदत होती. आता मुदतवाढ दिली आहे, अशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.