केंद्राकडून “बफर स्टॉक’ उपलब्ध
पुणे – देशात सध्या कांद्यांची तीव्र टंचाई जाणवत असल्याने त्याचे दरही गगनाला भीडले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुमारे 56 हजार टन काद्यांचा “बफर स्टॉक’ उपलब्ध करून दिला आहे.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांतून कांद्यांची मोठी आवक होत असते. यंदा पाऊस लांबल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी आता नव्याने कांदा पीक यायला साधारण जानेवारी ते फेब्रुवारी उजाडणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहतील असा अंदाज आहे. अनेक ठिकाणी बाजारातून कांदा गायब झाला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने “बफर स्टॉक’ बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे 56 हजार टन कांद्याचा स्टॉक बाजारात येणार असून त्यापैकी 16 हजार टन कांदा बाजारात आणला गेला आहे. हा कांदा दिल्ली, त्रिपूरा आणि आंध्रप्रदेश या राज्य एजन्सीमार्फत विक्री करण्यात येणार आहे.
निर्यात बंद आणि आयात सुरू
कांदा निर्यातीला बंदी घालताना केंद्र सरकारने आयातीला मात्र परवानगी दिली आहे.कांदा निर्यातीसाठी असणारे मुल्य सुद्धा वाढविण्यात आले आहे व निर्यातीवर मिळणारे अनुदानही काढले आहे. दुसरीकडे मात्र आयातीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.विविध देशातून हा कांदा मागविण्यात येत आहे.