कांद्याला प्रतिकिलो 5 रुपये अनुदान देण्याची मागणी
लाखणगाव – कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला असून कांदा उत्पादकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. शासनाने निर्णायक भूमिका घेऊन कांदा उत्पादकांना प्रती किलो पाच रुपये अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना सध्या कमी बाजारभावात कांद्याचे विक्री करावी लागत असून, भांडवली खर्च, आजपर्यंत साठवलेला कांदा, विक्रीचा भाव यांचा मेळ घालता कांद्यापासून शेतकऱ्यांच्या हाती काही येत नसून, सरकारने यात तोडगा काढून कांद्याचे बाजारभाव वाढविले पाहिजेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्या शेतकरी कांदा भरणी करत असून, मागील चार ते पाच महिन्यांपासून साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांनी आता कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवण्यास सुरुवात केली आहे; परंतु या कांद्याला चांगला आणि योग्य प्रकारचा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कांदा रडवू लागला असल्याने शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
मागील वर्षी कांदा बियाणे तयार करण्यापासूनचा कालखंड पाहिला तर वर्षभरात जास्त कालखंड होऊन गेला असेल अजूनही चांगला बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत लावला आहे. सध्या कांद्याला आठ ते दहा रुपये किलो बाजारभाव मिळत असून क्वचित प्रती किलो तेरा रुपये किलो दराने मिळत आहे.
त्यामुळे सरासरी शेतकऱ्यांना आठ, नऊ, दहा रुपये याप्रमाणे प्रतिकिलो कांदा विकावा लागत आहे. एकंदर भांडवली विचार करता साडेतीनशे ते चारशे रुपये पिशवी प्रमाणेच हातात पैसे येतात. आजपर्यंत झालेला खर्च व मार्केटला गेल्यानंतर मिळणारे उत्पन्न यांचा मेळ घालत उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे.
20 रुपये किलो भाव मिळावा
या परिसरातील शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे कांद्याचे पिकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते; परंतु कांद्याचा बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच हाती लागत नसून, पुन्हा एकदा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे शासनाने यात योग्य तो मार्ग काढून कांद्याचे बाजारभाव कमीत कमी वीस रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्यांना मिळावेत अशी अशी मागणी वाढू लागली आहे.