प्रयत्न करूनही कांद्याचे दर चढेच
पुणे – निर्यातीवर बंदी आणून बराच कांदा आयात केला जात असला तरी कांद्याची दरवाढ चालूच आहे. त्यामुळे कांद्याच्या साठामर्यादेला मुदतवाढ दिली आहे. यामुळे कांद्याचे दर कमी होण्यास मदत होईल, असे सरकारला वाटते.
याअगोदर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कांद्याची साठामर्यादा 100 क्विंटल आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी 500 क्विंटल होती. याची मुदत बुधवारी संपणार होती. मात्र, परिस्थिती आणखीही सुधारलेली नाही. त्यामुळे पुढील सूचना निघेपर्यंत मर्यादा कायम असणार असल्याचे सार्वजनिक वितरण विभागाने स्पष्ट केले आहे.त्याचबरोबर एखाद्या राज्यांमध्ये ही मर्यादा आणखी कमी करण्याची गरज भासल्यास राज्य सरकार ही मर्यादा कमी करू शकतात, असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव के. श्रीवास्तव यांनी सांगितले.
राज्यात कांद्याचा साठा आणि दर याबाबत काय परिस्थिती आहे, यासंबंधातील अहवाल राज्यांना आठवड्याच्या पातळीवर केंद्र सरकारला द्यावा लागणार आहे. या विषयाचे गांभीर्य पाहून सरकारने 5 वरिष्ठ मंत्र्यांची या विषयावर एक समिती नेमली आहे. समितीची बैठक या अगोदरच झाली असून आणखी एक बैठक होणार आहे. विषम पर्जन्यमानामुळे कांद्याच्या पिकावर परिणाम झाला आहे. कांदा ज्या राज्यात येतो त्या राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस उशिरा आला तर, काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे यावर्षी कांद्याचे उत्पादन कमी होणार आहे.