नवी दिल्ली- उत्सवाच्या काळात कांद्याचे दर वाढू नयेत याकरिता केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र तरीही मोठ्या शहरात कांद्याचे दर वाढत आहेत.
गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यामुळे वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्याचबरोबर कांद्याच्या पिकावर परिणाम होत असल्यामुळे कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी चेन्नईत कांद्याचे दर 73 रुपये प्रति किलो, दिल्लीत 51 रुपये प्रति किलो, कोलकात्यात 65 रुपये प्रति किलो तर मुंबईत 67 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. पावसामुळे एक तर खरीपाचा कांदा खराब होत आहे. त्याचबरोबर वाहतुकीत अडथळे येत असल्यामुळे काही काळ दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
नाशिक ही कांद्याची घाऊक बाजारपेठ आहे. येथे कांद्याचे दर 66 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले आहेत. गेल्या वर्षी या आठवड्यात नाशिक बाजारपेठेत कांद्याचे दर केवळ 35 रुपये प्रति किलो होते. सरकारचे कांद्याच्या दरवाढीकडे लक्ष असून परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.