कराड – रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या कांद्याने भलताच भाव खाल्ला आहे. मागील काही वर्षांचा दरातील उच्चांक मोडत शंभरावर दर येऊन ठेपल्याने महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. सध्या मोठ्या बाजारात कांद्याचे दर 80 ते 90 रुपये किलो तर किरकोळ बाजारात तेच दर 100 रूपये किलो झाले आहेत.
कोणताही पदार्थ कांद्याशिवाय पूर्ण होतच नाही. त्यामुळे कांदा हा रोजच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ बनला आहे. परंतु कांद्याचे कमी झालेले उत्पन्न आणि दक्षिणेकडील राज्यांकडून मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे सध्या महाराष्ट्रात कांद्याची कमतरता झाली आहे. यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर सतत वाढत असल्याने किरकोळ बाजारातही दरवाढ होत आहे.
आठवडा बाजारात कांद्याने शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या दरवाढीमुळे कांदा खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. गृहिणींबरोबर व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. भजीमध्ये कांद्याऐवजी कोबीचा वापर केला जात आहे. मात्र इतर पदार्थात कांद्याचाच वापर होत असल्याने परिणामी खाद्य पदार्थांच्या दरातही वाढ झाल्याचे दिसत आहे.
या दरवाढीचा चांगलाच फटका बसत आहे. या दरवाढीमुळे अनेकांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. महिलांचे तर या दरवाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडत आहे. वाढत्या महागाईने घर चालवायचे कसे यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा आहे. अजून काही दिवस कांद्यांची दरवाढ होणार असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा सामना करावा लागणार आहे.