नवी दिल्ली – उत्सवाच्या काळामध्ये कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातील बराच कांदा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशभरात कांद्याचे दर आवाक्यात आहेत. मात्र अजूनही टोमॅटो आणि बटाट्याचे दर वाढीव पातळीवर आहे. ते कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र सरकारकडून केल्या जात आहेत.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासूनच योग्य प्रमाणात कांदा खुल्या बाजारात उपलब्ध केला जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून कांद्याचे दर आवाक्यात आहेत. सध्या मोठ्या शहरांमध्ये कांद्याचा दर साधारणपणे 42 रुपये ते 57 रुपये प्रति किलो या पातळीवर आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की 12 ऑक्टोबर पर्यंत 67 हजार टन इतका कांदा राखीव साठ्यातून खुल्या बाजारासाठी उपलब्ध केला आहे.
त्यामुळे दिल्ली, कोलकत्ता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळूरु, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची या शहरातील कांद्याचे दर आवाक्यात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्येही काही प्रमाणात राखीव साठा उपलब्ध केला जात आहे. कांद्याचे दर स्थिर रहावे याकरिता 2020-21 मध्ये केंद्र सरकारने दोन लाख टन कांद्याचा राखीव साठा केला होता.
कांद्याचे दर नियंत्रणात असले तरी अजूनही बटाट्याचे दर नियंत्रणात आलेले नाहीत. बटाट्याच्या उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसला तरी पावसामुळे बटाट्याच्या वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे बटाट्याचे दर वाढले आहेत. आता पाऊस कमी झाला आहे आणि वाहतूक सुरळीत झाली आहे.
त्यामुळे बटाट्याचे दर कमी होतील असे मंत्रालयाने सांगितले आहे. सध्या देशभरात साधारणपणे बटाटा 21 रुपये प्रति किलो तर टोमॅटो 41 रुपये प्रति किलो या भावाने मिळत आहेत. टोमॅटोच्या उत्पादनावर पावसामुळे परिणाम झाला आहे. त्यामुळे काही काळ टोमॅटोचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.