मागील आठवड्यात पन्नाशीत असणारा कांदा तिशीपर्यंत उतरला
रांजणी (वार्ताहर) – अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने किरकोळ बाजारात 60 ते 65 रुपये किलो असलेल्या कांद्याचा राज्यात पुरवठा वाढल्याने येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव प्रतिकिलो 30 रुपयांच्या खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार पेठांमध्ये कांद्याची आवक वाढत असून आता मालाचा दर्जाही चांगला आहे.
राज्यात अवकाळी पावसाने कांदा उत्पादनात मोठी घट झाली होती, त्यामुळे महिनाभरापूर्वी कांद्याचा तुटवडा भासल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपये किलोवर गेले होते. मात्र जसजशी कांद्याची आवक वाढू लागली तसे कांद्याचे दर कमी होऊ लागले आहेत.
आठवडाभरापूर्वी किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 50 ते 60 रुपये होते. मात्र अजूनही कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक विभागात कांद्याची चांगली आवक होत आहे. यंदा राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 20 ते 25 टक्के कांदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, असे असले तरी कांद्याचे दर आवक्यात येत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वास्तविक पाहता यंदा कांद्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे कांद्याचे दर गगनाला भिडले; परंतु राज्यातील उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या उत्पादनात घट झाली असली तरी ग्राहकांना पुरेल एवढ्या कांद्याचे उत्पादन निश्चित झाले आहे. किरकोळ बाजारात किरकोळ विक्रेते कांदा चढ्या भावाने ग्राहकांना विक्री करतात मात्र ग्राहकांनी बाजारपेठेत येऊन घाउक बाजारात कांदा खरेदी केला तर ग्राहकांना कांदा किमतीत परवडेल.
– सागर थोरात, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर
आवक पूर्वपदावर
यंदाच्या जानेवारी महिन्यात कांद्याची आवक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 13 जानेवारी 2020 पर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे 24 लाख क्विंटल आवक झाली होती. जानेवारी महिन्यात रोज साधारणपणे एक ते सव्वा लाख क्विंटल माल बाजारात येत आहे, त्यामुळे कांद्याची आवक चांगल्यापैकी वाढल्याने किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता 25 ते 30 रुपयांवर येऊ शकतो.