पुणे – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातल्यानंतर याविरोधात कांदा उत्पादकांनी आंदोलन केले असले तरी गुरुवारी कांद्याच्या भावात काही प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले.
भारतातील कांद्याची मुख्य बाजारपेठ नाशिकजवळील लासलगाव येथे आहे. लासलगाव येथून आलेल्या वृत्तानुसार त्या ठिकाणी घाऊक कांद्याचा दर कमी होऊन प्रति किलोला 30 रुपये इतका झाला आहे. सप्टेंबरच्या मध्यात या कांद्याचा दर लासलगाव येथे 51 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास फाउंडेशन या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार लासलगाव येथे कांद्याचे दर उतरू लागले आहेत.
लासलगाव येथील कांद्याच्या दरावरून देशभर कांद्याचे दर ठरविले जातात. लासलगाव येथे कांद्याचे दर कमी झाल्यामुळे
आता पुणे मुंबईसारख्या शहरातही त्या प्रमाणात कांद्याचे दर कमी होऊ शकतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यात पाऊस पडल्यानंतर कांद्याच्या उत्पादनावर आणि वाहतुकीवर परिणाम होऊन ऑगस्ट
महिन्यापासून कांद्याचे दर वाढत होते.
त्यानंतर केंद्र सरकारने आपल्याकडील कांद्याचा साठा खुला केला होता, त्याचबरोबर कांद्याच्या निर्यातीचे किमान दर वाढविले होते. मात्र, तरीही कांद्याचे दर वाढल्यानंतर गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार इजिप्तसारख्या देशातून कांद्याचे आयात करण्याचा शक्यतेवढा विचार करीत असल्यामुळे ही लासलगाव येथील गाऊ बाजारात कांद्याचे दर कमी झाले असल्याचे सांगितले जाते.