दरवाढीमुळे सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल
पेठ-अतिवृष्टीने एकीकडे शेतकऱ्यांची दैना उडविली असतानाच दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्यांची मात्र आता चांदी झाली आहे. याच कांद्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. कांद्याच्या गगनाला भिडलेल्या भावावरून सध्या सोशल मिडीयावर हीच बाब प्रकर्षाणे दिसून येत आहे. कांद्याबाबत विविध पोस्ट व्हायरल होत असून यातून हास्याचे फवारे उडत आहेत.
परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने व नवीन कांदा बाजारात येण्यास अजूनही बराच अवधी असल्यामुळे जो कांदा सध्या बाजारात उपलब्ध आहे तो सुमारे 150 रूपये किलोने विकला गेला. सोशल मिडीयावर याबाबत मात्र विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. जेवण करताना केवळ कांदा हुंगायला देणे, सध्या सगळ्यात महागडा दागिना म्हणून बायकोला कांद्याचे सर्व अलंकार भेट देणे, शेजारणीला तिजोरीतून एक-दोन कांदे उसणे देणे, डॉलरची घसरण, एका डॉलरमध्ये एक किलो कांदेही येत नाहीत.
रिक्षावाला मोठ्या कांद्यांच्या बदल्यात सुटे म्हणून गोटी कांदा देणे असे एक ना अनेक व्हिडीओ, विनोदी पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वत्रच हास्यकल्लोळ उठत आहे. सोशल मिडीयावर काहींनी शेतकऱ्यांची देखील बाजू मांडली आहे. शेतकरी व त्यांचे कुटुंबीय घेत असलेले कष्ट व त्या बदल्यात मिळणारा भाव, कधी कधी बाजारभावाअभावी पिक फेकून देण्यापर्यंत होणारी परवडही शब्दांतून व्यक्त केली आहे. कांदा महाग नाही, लोकांचे विचार स्वस्त झालेत, असे म्हणत फुकट खाणारी जनता किती दिवस 5 अन् 10 रूपये किलोने शेतकऱ्यांचा माल खातील. सर्वांनी 150 रूपये किलो दराने कांदा खाण्याची तयारी ठेवावी. एकंदरीतच सध्या सोशल मीडिया कांदापुराणाने व्यापला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.