मेढा – जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसल्याने राज्यात सर्वत्र कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या या वर्षीच्या एकूण उत्पादनापैकी केवळ 25 टक्के कांदा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारात मागील तीन महिन्यांपासून कांद्याची आवक मंदावली आहे. परिणामी कांद्याची मागणी पूर्ण होत नसल्याने कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी बाजारात 12 ते 15 रुपये किलो असलेला कांदा सद्यस्थितीत 40 ते 50 रुपये किलो झाला आहे. यामुळे किरकोळमध्येच कांदा 50 रुपये किलो झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक जावळी तालुक्यासह इतर ठिकाणी ही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याला पाणी लागल्याने कांदा पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे कांद्याची कमतरता जाणवू लागली आहे. मेढा शहरात सोमवारी आठवडी बाजार असल्याने कांद्याची गरज पूर्ण करण्यासाठी दररोज बाजारात 20 ते 25 गाड्या कांद्याची आवक गरजेची आहे. मात्र मागील महिन्यांपासून ही आवक 7-8 गाड्यांवर आली आहे.
साठवणुकीच्या कांद्यालाही पाणी लागल्याने तो ओलसर होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या वर्षीच्या एकूण उत्पादनातून आता केवळ 25 टक्के कांदा शिल्लक आहे. अशी महिती शेतकरी देत आहेत. नवीन कांदा येईपर्यत हा कांदा टिकवायचा आणि पुरवायचा आहे. त्यामुळे शेतकरी थोडाथोडा कांदा बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्याचे आठवडी बाजारातील दर 40 ते 60 रुपये किलो झाले आहेत.