कांद्याचे दर किंचित घटले : शहरी चाकरमान्यांना दिलासा
पुणे – कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे 20 रुपयांची घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात 60 ते 80 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कांदा आता 40 रुपये किलोने उपलब्ध आहे.
गेल्या महिनाभरात कांद्याचे दर टप्प्या-टप्याने वाढून 80 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यामुळे गृहिणींचे महिनाभराचे बजेट बिघडले होते. त्यानंतर दैनंदिन आहारातून कांदा गायब झाला होता. एरव्ही कांद्याचा ढिग असलेली भाजीमंडईतील गाळ्यांवर पाच-दहा किलो कांदा दिसू लागला आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणत, कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतर बाजारातील कांद्याची आवक काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कांद्याचा प्रतिकिलोचा दर 40 रुपयांवर पोहोचला आहे. सध्या पुण्यात कांद्याची अपेक्षित आवक होत नसली तरीदेखील होणारी आवक पुरेशी आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कांदा भाववाढीमुळे सुखावलेला शेतकरी आता दरघटीमुळे हिरमुसला आहे.
शेतकऱ्यांना कंगाल करू नका
कांद्यावर निर्यातबंदी लादल्यानंतर देशातंर्गत बाजारपेठेत बाजारभाव गडगडत आहे. त्यामुळे 80 रुपयांवर जाऊन ठेपलेला कांद्याचा बाजारभाव ढासळत जात आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. विधानसभा निवडणुकीत कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने केंद्रातील भाजप सरकारने भाव नियंत्रणात आणले आहे. त्यामुळे एकीकडे शहरी नागरिकांचा रोष कमी करताना शेतकऱ्यांचा संताप उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे.