चिंबळी परिसरातील शेतकरी मजुर टंचाईमुळे त्रस्त
चिंबळी – चिंबळी (ता.खेड) परिसरात कांदा लागवड अंतिम टप्यात आली आहे. या परिसरात औद्योगिकीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमजूर टंचाई जाणवत आहे. या भागात कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची विहिरीच्या पाण्यावरच भिस्त आहे. यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने कांदा उत्पादन वाढण्याची चिन्हे आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे या परिसरात शेतकरी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत.
या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेततळी, विहिरी, तुुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे या भागात कांदा लागवडीला वेग आला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने काही ठिकाणी कांदा रोपांचा तुटवडा भासल्याने कांदे लागवड रखडली आहे. काही भागात अजुनही कांदा लागवड शेतकरी करीत आहेत.
शेतकरी वर्गानी खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, वाल, मुग, उडीद इतर पिकाची काढणी करून शेतीची मशागत करत शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड सुरू केली आहे. चाकण, आळंदी येथील मजूर आणून कांदा लागवड करून घेतली जात आहे. मजूर टंचाईमुळे कांदा लागवड रखडली असून शेतकरी शेतात ज्वारी, बाजरी सारखी कमी पाण्यावरील पिके घेऊ लागला आहे.