डाळी-फळांपेक्षाही महागला : आवक घटल्याने दर तेजीतच
पिंपरी – दैनंदिन जीवनाचा आवश्यक घटक असलेल्या कांद्याने दराच्या बाबतीत बहुतेक सर्वच वस्तूंना मागे टाकते उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. अतिशय वेगाने महागत असलेला कांदा भाजी मंडईत सर्वांत महाग ठरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील किरकोळ बाजारात कांद्याचा दर 150 ते 160 रुपये प्रति किलोच्या घरात गेला आहे. परिणामी ग्राहक कांदा खरेदी करताना हात आखडता घेत असून सध्या कांद्याला जो दर आहे तो दर डाळी आणि फळांच्या दरापेक्षाही जास्त आहे. महागलेला कांदा आता गरीबांच्या आवाक्यातून पूर्णपणे बाहेर गेला आहे. यामुळे किरकोळ विक्रीमध्येही मोठी घट निर्माण झाली आहे.
विक्रीतही मोठी घट : नागरिकांनी आखडता घेतला हात
मागील महिन्यात झालेल्या आवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि बाजारातील कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे, 15 ते 20 रुपये प्रति किलो असलेला कांद्याची किंमत घाऊक बाजारात शंभरीच्या पुढे जावून पोहचली. पिंपरी-चिंचवड शहरातील घाऊक बाजारपेठ असलेल्या मोशी येथील उपबाजार समितीमध्ये कांदा प्रतिक्विंटल दहा हजार रुपये झाला होता.
त्यांनतर मागील आठवड्यात या दरामध्ये काहीशी घसरण झाली होती. मात्र, चार दिवसांपासून बाजारात पुन्हा कांद्याची आवक घटल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोशी येथील उपबाजार समितीमध्ये दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची विक्री होत आहे. तर प्रति किलो 100 ते 120 रुपये दर मिळत आहे. घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात दर वाढल्यामुळे आता किरकोळ बाजारातही कांद्याने उच्चांक गाठला आहे. पिंपरी येथील लालबहाद्दुर शास्त्री भाजी मंडईमध्येही कांदा प्रतिकिलो 150 ते 160 रुपये दराने विकला जात आहे.
सफरचंदालाही मागे टाकले
बाजारात सर्वाधिक महाग सफरचंद हे फळ समजले जायचे. श्रीमंताचे फळ मानल्या जाणाऱ्या सफरचंदालाही कांद्याने मागे टाकले आहे. बाजारात सफरचंद 80 ते 120 रुपये किलो दराने विकले जात आहेत. परंतु कांदा मात्र दीडशेच्या पार गेला आहे. सध्या सिताफळ 45 ते 75 रुपये किलो, डाळिंब 40 ते 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. फळांबरोबरच इतिहासात पहिल्यांदाच बाजारात धान्य, फळे व भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक किंमत कांद्याला मिळू लागली आहे. त्याचप्रमाणे महागलेल्या डाळींनाही कांद्याने खूप मागे टाकले आहे. काही डाळींपेक्षा कांद्याचा दर दुप्पट आहे.
खराब कांद्यालाही “अच्छे दिन’
एरव्ही बाजारात सडका कांदा फेकून दिला जात असे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये सडक्या कांद्यालाही “अच्छे दिन’ आले आहेत. व्यापारी सडक्या कांद्यामधून थोडा चांगला कांदा निवडून तो बाजारात विक्रीसाठी ठेवत आहेत. या खराब कांद्याला 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
बाजारात कांद्याची आवक अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे, कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. या आठवड्यात तर उच्चांकी दर गाठल्यामुळे कांद्याची विक्रीही कमी झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत विक्री निम्म्याहून कमी झाली आहे.
– शहबाज सय्यद, विक्रेते