शेवगाव – परतीच्या पावसाने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे होते नव्हते ते खरीप पीक वाया गेले. शेतात उभे असलेले कांद्याच्या पिकाने तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पावसाने कांद्याने नुकसान झाले. पण उरला सुरला कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे हा कांदा बाजारात विक्रीला घेवून जाणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रोटा फिरविण्याची वेळ आली आहे. तर कांदा मार्केटला न विकला गेलेला कांदा तेथेच टाकण्यात येत असल्याने सध्या मार्केट परिसरात कांद्याचा सडा पडला आहे.
यंदाच्या पावसाचे आकडे पाहिले तर सरासरीपेक्षा तो अधिक मेहरबान झाला. तालुक्यात सरासरीच्या 110 टक्के पाऊस झाला आहे. ओढे, नाले, नद्या आजही तुडुंब भरून वाहत आहेत, ही तशी सुबत्ता वाटत असली तरी वास्तव परिस्थिती काही वेगळी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीप्रधान परिसराचा पुरता बट्ट्याबोळ झाला. शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले असून बहुतेक खरीप वाया गेले. शेतात अद्यापही पाणी असल्याने रब्बीवरही नुकसानीचे सावट घोंगावत आहे. मागील दुष्काळामुळे कणग्या, बळद रिकामी आहेत. शेतकऱ्यांच्या घरात विक्रीला काढण्यासाठी काहीही शिल्लक नाही, अशी स्थिती झाल्याने येथे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हे समीकरण बदललेले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी कांद्याकडे आकर्षित झाला.
आता तर या कांद्यानेही वांधा केला आहे. यंदा सहा हजार हेक्टरवर कांदा लावण्यात आला. अतिवृष्टीमुळे सर्वात अधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शेवगाव कांदा मार्केटला 58 हजार क्विंटलवर कांदा विक्री झाली होती. भावही जास्तीत जास्त 6 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला. या वर्षी याच कालावधीत अवघ्या 14 हजार क्विंटलची आवक झाली आहे. भावही सहाशे रुपये क्विंटलच्या पुढे गेला नाही. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याची साठवणूक करणे शक्य नसते. देखभालीत थोडे इकडेच तिकडे झाले तरी कांदा लगेच सडतो, खराब होतो.
यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील मिळाला नाही. कांदा पिकासाठी एकरी किमान शेत नांगरणी, रोटा फिरवणे, फडकी तयार करणे, बी बियाणे वा रोपांचा खर्च, लागवडीचा खर्च, खते व औषध फवारणी, काढणी आणि कापणीचा असा जवळपास किमान एकरी 40 हजार रुपये खर्च येतो. यंदा शेतकऱ्याचा हा खर्च तर वाया गेला असून त्याशिवाय तो विकण्याच्या प्रयत्नात आणखी घाटा येत असल्याची उदाहरणे आहेत. दादेगावच्या महादेव दारकुंडे या शेतकऱ्याने गेल्या वर्षी कांद्याचे एकरी चांगले उत्पन्न घेतले. भाव समाधानकारक मिळाल्याने त्यांनी यंदाही एक एकर कांदा केला. साधारणतः 150 गोण्या कांदा अपेक्षित असताना 28 गोण्या कांदा झाला. तो विक्रीसाठी शेवगाव कांदा मार्केटला आणला असता त्यातील फक्त एकोणीस गोण्याचा लिलाव होऊ शकला. खराब असलेल्या नऊ गोण्या कांदा व्यापाऱ्यांनी घेतला नाही.