पुणे – मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. त्या तुलनेत मागणी असल्याने भेंडी, काकडी, शेवगा आणि टोमॅटो वगळता सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भेंडी, काकडी, शेवगा आणि टोमॅटोच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. कांदा आणि बटाट्याचे भावही आवाक्यात आल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
बाजारात रविवारी 80 ते 90 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून 12 ट्रक गाजर, कर्नाटक, गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, मध्य प्रदेश येथून मटारची 30 ते 35 ट्रक, तर मध्य प्रदेश आणि गुजरात येथून 10 ते 12 ट्रक लसणाची आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1500 ते 1600 पोती, कोबी सुमारे 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्प्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, टोमॅटो सात ते साडेसात हजार पेटी, भुईमूग शेंगा सुमारे 40 ते 50 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, कांद्यामध्ये जुना 30 ट्रक, तर नवीन 70 ते 75 ट्रक, आग्रा, इंदौर, गुजराथ आणि स्थानिक मिळून बटाट्याची 45 आवक झाली.