जुन्नरच्या पूर्व भागात चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता
अणे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये रब्बी हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. या भागातील राजुरी, वडगाव कांदळी, उंचखडक, गुंजाळवाडी, बोरी बुद्रूक, साळवाडी, जाधववाडी, भोरवाडी,शिरोली सुलतानपूर या गावांमध्ये रब्बी हंगामात पिकवल्या जाणाऱ्या फुरसुंगी जातीच्या कांदा लागवडीला सुरवात
झाली आहे.
यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला असला तरी तरी शासनाच्या निर्यात बंदी धोरणामुळे अनेक शेतकऱ्याचं मोठे नुकसान झाले आहे. कांद्याला मोठ्या प्रमाणात भांडवल लागत असून बदलत्या हवामानाचा कांद्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. पहाटेच्या वेळी पडणारे धुके व नोव्हेंबरच्या मध्यानंतरही थंडी न पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या चालू असलेल्या कांदा लागवडींमुळे परिसरातील महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळत आहे.
महिलांबरोबर वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना गाडी भाडे मिळत आहे. सध्याला लागवड होत असलेला रब्बी हंगामातील कांदा साठवणुकीसाठी योग्य असतो. हा कांदा उन्हाळ्यामध्ये काढणीला येत असून, शेतकरी या कांद्याच्या साठवणुकीवर भर देतात.
कांद्याला हमीभाव मिळावा
यावर्षी अवकाळीने रोपांचे झालेले नुसकान, रोपांची कमतरता व वाढलेले भरमसाठ भाव, खतांच्या वाढत्या किमती, मजुरांची कमतरता, वाढती मजुरी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने कांद्याला हमीभाव द्यावा, निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांनी सुरुवातीला जी कांद्याची रोपे टाकली आहे ती या वर्षीच्या अवकाळी पावसाने वाया गेली, त्यामुळे रोपांचे भाव तिप्पट वाढले आहेत. शिल्लक राहिलेल्या रोपांवर करपा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे. कांदा रोप जगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च झाला आहे. एक एकर कांदा लागवड करण्यासाठी अठरा ते वीस हजार रुपये निव्वळ रोपांचा खर्च येतो, तर संपूर्ण लागवडीचा खर्च एकरी पन्नास हजार रुपये येतो. त्यात कांदा पिकास सध्या पोषक हवामान अजून तरी नाही.
– पोपट बढे, प्रगतशील शेतकरी, वडगाव कांदळी