ना. बच्चू कडू यांचा ठाम निश्चय; घारेवाडीत हजारो युवकांचा युवा जागर
कराड (प्रतिनिधी) – राजकारणात तरुणांना संधी आहे. मात्र प्रामाणिकपणे सेवा केल्यास यश नक्की मिळते हे मी सिद्ध करून दाखवले आहे. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आमदारांची राहुटी गावागावात नेणे गरजेचे आहे. भिक्षुकांसाठी लवकर नवीन कायदा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.देशात जाती धर्माचे वातावरण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर एक गाव तिरंग्याचे हा उपक्रम राबवणार असल्याचा ठाम निश्चय केल्याचे प्रतिपादन ना. बच्चू कडू यांनी केले.
घारेवाडी, ता. कराड येथे बलशाली युवा हृदय संमेलनात राजकारणातील तरुणांचा सहभाग या विषयावर ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख, अमरसिंह पाटणकर, प्रा. श्रीधर साळुंखे, कोमल पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी, अरविंद कलबुर्गी, विश्वनाथ खोत, संजय पाटील, देवेंद्र पिसाळ, संभाजी देवकर, मधुकर सावंत, सचिन पाटील, महेश मोहिते, दत्तात्रय पवार, शंकर पाटील, धनंजय पवार, स्मिता पिसाळ, राहुल पाटील, महेश नलवडे, प्रताप भोसले यांच्यासह तरुण उपस्थित होते.
ना. बच्चू कडू म्हणाले, राजकारणात तरुणांचा सहभाग नसल्यासारखाच आहे. बापजाद्यांच्या जीवावर त्यांचीच मुले आमदार, खासदार होतात. सामान्यातील सामान्य तरुण स्वकर्तृत्वावर आमदार, जिल्हा परिषद सदस्य होवू शकत नाही. मात्र प्रामाणिक सेवा केली तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. सध्या राजकारणात वाईट अवस्था आहे. प्रामाणिकता संपली आहे का ? अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे नवीन कार्यकर्ता तयार होत नाही ही शोकांतिका आहे. तरुणांनी राजकारण्यांना गंभीरपणे घेवू नये. माझ्या घराण्यात कोणीही राजकारणी नव्हते. सेवेच्या भरवशावर चार वेळा मी निवडूण आलो आहे. अपंगांसाठी शासनाने अजूनही मदत करण्याची गरज आहे. ज्यांना जेवण मिळत नाही, अशी आजही अनेक कुटूंबे आहेत. त्यांना मदत करावी. जिवंत विधवा महिलेला नवरात्रीत मदत केली तर त्यांची दुःखे कमी होतील. अलिकडे श्रद्धेचाही बाजार मांडला जात आहे.
मंत्री जयंत पाटील म्हणाले, पोटतिडकीने गरिबांसाठी प्रश्न मांडणाऱ्या ना. बच्चू कडू यांनी महाराष्ट्रात आदर्श काम केले आहे. कान टोचणारा मंत्री आम्हाला मंत्रीमंडळात लाभला आहे. प्रवास आणि अनुभवाने आपण कचाट्यात सापडलो की जे काम घेतले आहे ते आपण सोडून देतो. मात्र राज्यातील चार हजारांवर तरुण घारेवाडीत मंथनासाठी आले आहेत ही चांगली बाब आहे. असेही ना. पाटील यांनी नमूद केले.