आळंदी – अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. त्याचबरोबर यंदाही “एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवून करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावरील ताण कमी करावा, असे आवाहन आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी त्यावर समंती दर्शविली.
आळंदी येथे सार्वजनिक गणेशोत्सवची बैठक सोमवारी (दि. 6) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, त्यावेळी साबळे बोलत होते. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगराध्यक्षा वैजंता उमरगेकर, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, शिवसेना नेते उत्तम गोगावले, मच्छिंद्र शेंड्ये, किशोर तर्कासे, राम खरात, अरुण घुंडरे, दत्तात्रेय सोनटक्के आदी उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीत उपस्थितांमध्ये साधक-बाधक चर्चा करीत सर्वांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवून यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा अत्यंत साधेपणाने साजरा करूया असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घराघरात बसविली जाणारे गणपती बाप्पांचे आगमन आणि दहा दिवस चालणारा सार्वजनिक गणेशोत्सव सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे. करोनाला हद्दपार करूया आणि तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन साबळे यांनी केले.