छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्री दोन गटांत वाद झाला. या वादानंतर काही वेळातच या परिसरात दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक देखील करण्यात आली. यावेळी जमावातील काही लोकांनी पोलिसांच्या वाहनांसह 15 खासगी वाहने देखील जाळली. या घटनेनंतर जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा सुद्धा वापर केला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या राड्याप्रकरणात पोलिसांनी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिनसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.