विलास पंढरी
अक्षय म्हणजे जे क्षय पावत नाही ते व हा सण जेष्ठ महिन्यातील शुद्ध तृतीयेला येतो म्हणून याला म्हणतात अक्षय्य तृतीया. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते’.या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.हिंदू धर्म हा जगातील अतिप्राचीन धर्म असून अगणित देवदेवता व त्या अनुषंगाने येणारी व्रतवैकल्ये आणि सण हे त्याचे वैशिष्ट्य आहे.प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्रीय आणि सामाजिक कारणे असूनही धार्मिक अवडंबरामुळे आणि जातीभेदामुळे हिंदू धर्म बदनाम झाला आहे.
हिंदु दिनदर्शिकानुसार,गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा(दिवाळी पाडवा) म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो तसा या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. जैनधर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे. या दिवसाला खान्देशात आखा तीज (आखातीज )असेही म्हटले जाते.आखाजी अर्थात खान्देशातील अक्षय्यतृतीया- सासुरवाशीणींचा सण म्हणून साजरा केला जातो. खान्देशात या दिवशी घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचं भांडं ठेउन वरती खरबुज आणि दोन सांजोऱ्या आणि दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी असते. या दिवशी आपले पूर्वज पाणी पिंण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे. आधी त्यांना पाण्याचा घट देउन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो.
सकाळी उंबरठ्याचं औक्षण करून पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबर्यावर उमटवत आणी एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर/ आता गॅसवरच ‘घास’ टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासुनच आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरल्या पाणपोयांचे उद्घाटन केले जाते. खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात,पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन पूर्वी दोनदाच माहेरी जायला मिळायचं.
दिवाळी आणि आखाजीला. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जात असे. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं.आणि जावयाला शंकरजी!.माहेरी या सासुरवाशिणीचं खूप कोडकौतुक असायचं.
आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि असंच गोड धोड. दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथाऱ्या टाकल्या जातात. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.अहिराणी भाषेत गाणी म्हटली जातात.अर्थात हल्ली यातलं बरंच कमी होत चाललंय.उर्वरीत महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात या सणाला आकीती किंवा आखीती असे म्हणतात.या दिवशी पित्रे पाणी प्यायला येतात म्हणून टेरेसवर पाणी भरून छोटासा माठ ( मातीचे भांडे) ठेवतात.काही लोक आमरस पोळीचा नैवेद्यही ठेवतात.पूर्वी अक्षतृतीयेपूर्वी आंबे खात नसत.आता प्रीझर्वेटिव्हच्या जमान्यात वर्षवर कधीही आमरस खाता येतोय.
अक्षतृतीयेसंबंधी पारंपरिक व धार्मिक माहितीवर टाकलेला कटाक्ष.
ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुरामजयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती येते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने मदत केली अशी आख्यायिका प्रचलित आहे.
* या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
* नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.
* परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी श्रद्धा आहे.
बुंदेलखंडमधे अक्षय तृतीयेपासून प्रारंभ होऊन पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. त्यात अविवाहित मुली भाऊ, पिता तसेच घरातील व गावातील पुरुषांना शुभेच्छा देतात व गितगायन करतात. अक्षय तृतीयेला राजस्थानमधे मुहूर्तावर पर्जन्य देवतेची पूजा करून भरपूर पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते. मुली एकत्र येऊन घरो घरी जाऊन पर्जन्यदेवतेची गाणी म्हणतात आणि मुले पतंग उडवतात.या दिवशी सात प्रकारच्या अन्न पदार्थांनी नैवैद्य दाखवला जातो. माळवा प्रांतात नवीन भांड्यावर टरबूज आणि आम्ब्याचे डहाळे देऊन पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला शेतीच्या कामाला सुरुवात केली की शेतकऱ्यांना समृद्धी येते अशी इथे श्रध्दा आहे.
जैन धर्मीयांमधेही अक्षय तृतीयेला तृतीय विशेष महत्व आहे. याच दिवशी जैन धर्माचे ध पहीले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी एका वर्षाची तपस्या पूर्ण झाल्यानंतर प्रथम आहार घेतला होता. यश दिवशी राजा श्रेयांसने मुनिराजवृषभदेवांना भक्तिपूर्वक उसाच्या रूपात आहार दान (इक्षुरस) देऊन अक्षय पुण्य प्राप्त केले होते.
जैनधर्मियांची अशी श्रद्धा आहे की उसाच्या रसाला इक्षुरस म्हणत असल्याने या घटनेमुळेच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हटले जाऊ लागले. पुण्याईचा साठा वाढणण्यासाठी अक्षय तृतीयेचे पूजन सांगितले आहे. शक्यतो कुलदेवतेची पूजा करावी. कुलदैवत माहिती नसल्यास कुठल्याही देवाची पूजा करून कुलदैवतौ नम: असे म्हणावे. या दिवशी जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. जलदान, वृक्षसंवर्धन आणि मुक्या प्राणंना जीवनदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात.अक्षय ततीयेला केलेली पूजा ही घराणतील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उध्दार करते. शक्य असेल तर या दिवशी पाणपोया सुरू कराव्यात. पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी. झाडे लावा,झाडे जगवा, झाडे वाचवा हा मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेला संदेश देणारा हा सण आहे.प्रत्येक सणामागील ही चांगली तत्वे विचारात घेऊन सण साजरे केल्यास प्रत्येक सण खऱ्या अर्थाने समाजोपयोगी ठरेल.