जबाबदारी कोणाची : साथीच्या आजारांत वाढ होऊनही फवारणी नाही
जनतेच्या पैशांचा अपव्यय : अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाकडून 91 लाखांची कीटक व जंतूनाशक औषधांची खरेदी करण्यात येणार आहे. यापूर्वीची 1 कोटी 1 लाख 60 हजारांची कीटक व जंतूनाशक औषधे कालबाह्य झाल्याने फेकून देण्यात आली. उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर न करता वाढीव दराने औषध खरेदीमुळे साशंकता निर्माण झाली आहे. मुदतबाह्य औषधांची नेमकी जबाबदारी आरोग्य की भांडार विभागाची आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार भांडार विभागाने कीटक जंतुनाशक औषधांची खरेदी केलेली आहे. 1 कोटी 1 लाख 60 हजार रुपयांची औषधे मुदतबाह्य झालेली आहेत. याबाबत भांडार विभागाकडून वारंवार संबंधित आरोग्य अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तरीही त्याकडे संबंधित अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे एक कोटीपेक्षा अधिक किमतीची जंतुनाशके फेकून देण्याची वेळ आली. त्या मुदतबाह्य औषधांची जबाबदारी कोणाची आहे. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आयुक्तांनी या औषधांबाबात संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा घेणे आवश्यक होते. तसेच औषधांचा साठा असतानाही त्यांचा वापर केला नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र आयुक्तांनी याबाबत कुठलीही भूमिका घेतली नाही. परिणामी शहरवासियांच्या कररुपी पैशातून खरेदी होत असलेली औषधे वाया गेली. त्यामुळे आयुक्तांना शहरातील जनतेच्या पैशाची किमत नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मध्यंतरीच्या काळात शहरात डेंग्यूच्या आजारांने थैमान घातले होते. या आजारामुळे एकाच घरातील दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. डास, डेंगीच्या अळ्या, कीटक, जंतू यांचा संहार करण्यासाठी या जंतूनाशकांची खरेदी केली जाते. तसेच गटार, नाले, स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त परिसरात फवारणीसाठी कीटकनाशक पावडर, त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठीही औषधांचा वापर केला जातो. मात्र, शहरामध्ये साथीचे आजार व रोगराई पसरूनही या औषधांची फवारणी केली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2016 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत 1 कोटी 1 लाख 60 हजार रुपयांची कीटकनाशके कालबाह्य झाल्याने भांडार विभागात वापराविना पडून आहेत.
आरोग्य अधिकारी केवळ खरेदी काढून मलई काढण्याचा प्रयत्न करतात. सहायक आरोग्य अधिकाऱ्यांकडून वाढीव मागणी घेऊन ही औषध खरेदी करू लागले आहेत. औषधांचा वापर होत नसतानाही आरोग्य विभागाच्या मागणीनुसार भांडार विभागाने खरेदी केली. ती औषधे मुदतबाह्य झाली. ती चूक नेमकी कोणाची आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
– वसंत रेंगडे, सामाजिक कार्यकर्ते.
आरोग्य विभागाने मागणी केल्यानंतरच भांडार विभागाद्वारे कीटक-जंतूनाशक खरेदी केली जातात. त्यामुळे आरोग्य विभागाने मागविलेली औषधे नियोजित वेळेत उपयोग करणे गरजेचे आहे. भांडार विभागाद्व्रारे शिल्लक जंतू-कीटकनाशकाबद्दल वेळोवेळी आरोग्य विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे.
– मंगेश चितळे, सहायक आयुक्त, मध्यवर्ती भांडार विभाग.