मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात बीसीसीआयने तयार केलेल्या नियमांवर खेळाडूंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरीही काही नियम जाचक ठरणार आहेत. 90 मिनिटांच्या वेळेत एका डावाची षटके पूर्ण झाली नाहीत, तर क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाच्या कर्णधारावरच एका सामन्याची बंदी येऊ शकते.
बीसीसीआयने आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी नवी नियमावली तयार करत कोणत्याही संघाने या नियमांचे पालन केले नाही, तर सर्वात आधी कर्णधारावरच कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले आहेत. 90 मिनिटांत 20 षटके पूर्ण करण्याच्या नियमाचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय, षटकांची गती राखता आली नाही, तर संबंधित संघाच्या कर्णधाराला एका सामन्याची बंदीची शिक्षा होणार आहे.
नियमावलीनुसार, तीन सामन्यांत षटकांची गती राखता आली नाही, तर कर्णधारावर एका सामन्यावर बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 12 लाख, दुसऱ्यांदा चूक झाल्यास 24 लाख आणि तिसऱ्यांदा चूक झाल्यास 30 लाख रुपये इतका दंड केला जाणार आहे. तिसऱ्या चुकीमुळे 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी या दोन्हीचाही दंड होणार आहे.