मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या देशभरात रान उठले आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा पटोले यांनी केला. त्यानंतर भाजपाने काल राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी नाना पटोलेंविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी “नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्याला एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देणार” असल्याची घोषणा केली आहे.
जालना भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुजीत जोगस असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. “नाना पटोलेंची मस्ती वाढलीय. ती कशामुळे वाढलीय तर राज्यामध्ये अराजकता माजवणारं काँग्रेसचं सरकार आलंय. त्यामुळेच नाना पटोलेंना बळ मिळालं आहे. याच कारणामुळे नाना पटोले देशातील आपल्या यशस्वी पंतप्रधानांना काहीही म्हणतायत. मारहाण करण्याची भाषा देखील बोलली गेली, ही चुकीची भाषा आहे,” असे जोगस यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना, “मी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने आवाहन करतो की, नाना पटोलेची जीभ कापणाऱ्याला एक लाख रोख रक्कमेचं बक्षिस आम्ही आज आमच्यावतीने घोषित करतो. महाराष्ट्रामध्ये जो कोणी या नाना पटोलेची जीभ कापून आणेल त्याला एक लाख रुपये भाजपा युवा मोर्चा जालनाच्यावतीने आम्ही रोख रक्कम स्वरुपात देणार आहोत,” असे जोगस यांनी म्हटले आहे.
‘‘मी एवढ्या वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असे नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. त्यावर पटोलेंनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.