ओतूर (प्रतिनिधी) – नगर-कल्याण महामार्गावर माळशेज घाटानजीक वाटखळे गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. 18) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बी. के. मुठे यांनी दिली.
वसंत विठ्ठल डोंगरे (वय 60, रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते आपल्या मोटारसायकलवरून (एमएच 14 डीइ 316) सकाळी साडेआठच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जात असताना मागून भरधाव येणाऱ्या कारने (एमएच 04 डीआर 9981) डोंगरे यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यावेळी समोरून आळेफाट्याच्या दिशेकडे पिकअप गाडी (एमएच 05 आर 7703) येत होती. या गाडीलाही कारने धडक दिली.
यात वसंत डोंगरे हे जागीच ठार झाले, तर पिकअप गाडीतील श्याम दत्तात्रय थोरात व हेमंत नानाभाऊ बांगर (दोघेही रा. शिरोली) आणि कारचालक प्रशांत यतीराजम नायपेल्ली (रा. गोवंडी, मुंबई) हे तिघेजण जखमी झाले आहेत. ओतूर पोलीस ठाण्यात कारचालक प्रशांत नायपेल्ली यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.