नगर – राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने 31 जुलै रोजी राज्यातील 50 हजार सरपंच व उपसरपंच यांची देशातील सर्वात मोठी एक दिवसीय कार्यशाळा शिर्डी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये मानधनासह अतिशय महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले जाणार असल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गिते, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकरी विश्वजित माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, सरपंच परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काकडे यांनी सांगितले की, हा कार्यक्रम अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विनंती व मागणीनुसार होत आहे. चालू अर्थ संकल्पात सरपंचांच्या मानधनासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली असून, सरपंचांना जुलै पासून 5 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसेच सरपंचाचे काम सलभ होण्यासाठी व ग्रामपंचायत बळकटीकरणासाठी 35 विषेश अधिकाराच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र घडवताना गाव उभारणीत गाव कारभाऱ्यांना मदत होणार आहे.
यावेळी अनिल गिते म्हणाले की, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळाल्याने विकासाचे मोठे पर्व सुरु झाले आहे. राज्य शासनाने 20 मागण्या मंजूर करून त्याचे पत्र काढले आहे. यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये सरपंच कक्ष स्थापन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. शिर्डी मेळाव्यात उपसरपंच व सदस्य मानधन त्याच बरोबर राज्यातील सहा विभागातून सहा सरपंच आमदार साठी आरक्षण असावे ही आग्रही भूमिका मांडली जाणार आहे.
पहिल्या सत्रात सरपंच कार्यशाळा मार्गदर्शन व दुसऱ्या सत्रात सरपंच परिषदेकडून राज्य शासनाचा गौरव समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्यभर नियुक्त निरीक्षक याच्या समवेत जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सीईओ व डेप्युटी सीईओ, तालुका गटविकास अधिकारी एकत्रित बैठका घेऊन किमान 50 हजार सरपंच, उपसरपंच उपस्थित राहतील असा विश्वास राज्याचे ग्रामविकास सचिव अशिम गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, राज्य संघटक अविनाश आव्हाड, महिला उपाध्यक्ष अश्विनी थोरात यांनी केले.