ग्वाल्हेर : पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशराष्ट्राविषयी वक्तव्य केले आहे. एक दिवस पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतःच भारतात विलीन होतील, असा विश्वास शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी व्यक्त केला.
ग्वाल्हेरला एका कार्यक्रमा निमित्त ते आले असता त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आजच्या युगाशी संबंधित अनेक मुद्दे त्यांनी इथं मांडले. शिवाय, त्यांनी बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या हिंदू राष्ट्राच्या मागणीवर मत मांडलं, तर दुसरीकडं मुस्लिम धर्मगुरूंच्या मुस्लिम राष्ट्राच्या मागणीवरही त्यांनी आपले मत मांडले आहे.
यासोबतच महाराजांनी भारताचा विश्वगुरू होण्याच्या प्रवासाविषयी सांगत अखंड भारत का आवश्यक आहे? यावरही त्यांनी प्रकाश टाकला. जगतगुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्काराविषयी सांगितलं की, ‘धीरेंद्र एकदा मला भेटायला आले होते. मी धीरेंद्रची कथा किंवा प्रवचन कधीच ऐकलं नाही. शंकराचार्य असल्यामुळं मी माझा सर्व वेळ पुस्तकं लिहिण्यात आणि राष्ट्राचा विचार करण्यात घालवतो. पण, हिंदूंना भरकटण्यापासून वाचवणारी व्यक्ती म्हणजे धीरेंद्र आहेत.’
पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यासह इतर संतांनी हिंदू राष्ट्राच्या मागणीवर आवाज उठवल्यानंतर जगतगुरु शंकराचार्य म्हणाले, भारतासोबतच संपूर्ण आशिया खंडाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं लागेल. कारण, सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदू होते. कोणाला काही शंका असतील तर त्याही आम्ही सोडवू. मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज कोण होते हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल, त्यांनी हिंदू धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करावा. भगवान विष्णू हे सर्वांचे पूर्वज आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.