मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची काल म्हणजेच, 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती होती. आणि याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज्याच्या राजकीय पटावर शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा नवा पॅटर्न पाहायला मिळणार आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची काल अधिकृत युती झाल्याची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्याकडून करण्यात आली आहे. काल दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती. या युतीमुळं शिंदे गट आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. “ही आघाडी भाजपाला विरोध करण्यासाठी झाली आहे. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी यांची आघाडी झाली आहे. मात्र, या आघाडीचा कोणताच परिणाम भाजपावर होणार नाही.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते, देवेंद्र फडणवीसांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही अनेक विधान केली. यावेळी ते म्हणाले, “माझ्यासाठी त्यांनी मातोश्रीचे दार बंद केलं आहे, त्याबाबत मला आजही वाईट वाटतं. माझे वैयक्तिक वैर नाही, रश्मी वहिनी मला परवाच एका कार्यक्रमात भेटल्या होत्या. आमचं बोलणंही झालं. त्यावेळी मी उद्धव ठाकरेंना माझा नमस्कार सांगा.. असंही म्हणालो’. असं यावेळी फडणवीस म्हणाले.