मुंबई : राज्यात एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प असून सध्या १८ लाख लखपती दीदी आहेत. मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम असून राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचे साधन उपलब्ध व्हाव यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात मॉल तयार करणार, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५” चे उद्धघाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ हा गेली २१ वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. उमेदवार अभियानाची प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. ‘उमेदच्या’ माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात.
उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार
पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत उमेद मॉल उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू ही खाजगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून ती अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात. उमेद च्या माध्यमातून ६० लाख पेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत. या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ‘लखपती दीदी’ म्हटले जाते.
२५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करणार
आज महाराष्ट्रात ११ लाख पेक्षा जास्त ‘लखपती दीदी’ आहेत. मार्च २०२५ पर्यंत २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करणार आहोत. आगामी कालावधीत १ कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. स्त्रीशक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल. बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे.
शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, लाडकी बहिण योजना, एस. टी. मध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.