भिगवण – भिगवणचे मासे ही भिगवणची खास ओळख आहे. लगतच्या जिल्ह्यांतील चोखंदळ खवैय्यांनी यावर मोहोर उमटवली आहे. पण सध्या करोनाची महामारी हॉटेल व्यवसायावर आदळली आहे. त्यामुळे शासकीय नियमांची जंत्री आणि मंदी आदी कारणांमुे भिगवण परिसरातील हॉटेल्स ओस पडले आहेत.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेले व्यावसायीक मेटाकुटीला आले आहेत.
पुणे- सोलापूर महामार्गावर भिगवण हे पक्षी पर्यटन आणि ताजी मासळीच्या चवीसाठी विशेष ओळखले जाते. महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील सर्वांत मोठी मासळी बाजारपेठ आहे. परिसरात माशांचा विविध मेन्यू बनविणारी 50 हॉटेल्स आहेत. फक्त भिगवणमध्ये 30 हॉटेल आहेत. ही भिगवणकरांची खासियत आणि ओळख बनली आहे. 50 हॉटेलमधून दिवसाकाठी सरासरी सात हजार रुपये उलाढाल होत आहे. सर्व हॉटेल व्यावसायिकांची महिन्याकाठची उलाढाल सुमारे एक कोटींच्या घरात आहे. मात्र, करोनाच्या महामारीत हॉटेल व्यवसायाची भट्टी साडेतीन महिन्यांत पेटली नाही. व्यावसायिक बिकट अवस्थेतून
जात आहेत.
हॉटेल चालकांना हॉटेलच्या जागांचे भाडे भरणेही अवघड झाले आहे. कर्मचारी निघून गेल्याने व्यवसाय सुरू करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. व्यवसाय बंद असताना कामगारांना सांभाळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनेकांनी हॉटेल व्यवसाय बंद केला आहे. शासनाने सध्या हॉटेल चालकांना काही नियमांसहित व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. सुरूवातीला पार्सल द्यायची परवानगी मिळाली आहे.
आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत व्यवसाय चालविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, खवैय्या हॉटेलांत फिरकत असल्याने मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावचे प्रवासी नाहीत. महामार्ग ओस पडला आहे. पुणे व इतर तालुक्यांतून खास माशांच्या जेवणावळीवर ताव मारणाऱ्या शौकीनांचा संख्या घटली आहे. करोनाची महामारी व्यवसायावर आदळली आहे. त्याचे दूरगामी परिणाम आता भिगवणकरांना सोसावे लागणार आहे.
कामगारांची स्थितीही बिकट
भिगवण परिसरात हॉटेल व्यवसायावर सरासरी 250 कुटुंबे अवलंबून आहेत. यामध्ये अनेकजण बाहेरगावचे आहेत. त्यांना शेती वा इतर उत्पन्नाचा आधार नाही. त्यामुळे त्यांची स्थिती बिकट झाली आहे. हॉटेलमध्ये काम करणारे सुमारे 350 कामगार आहेत. त्याची रोजीरोटी याच व्यवसायावर चालत आहे. तेही बेरोजगारीच्या वाटेवर आहेत.
मासळी बाजारावरही परिणाम
सध्या हॉटेल व्यवसाय मंदीतून जात असल्याने मासळीची मागणी कमी झाली आहे. प्रत्येक हॉटेलला सुमारे 30 ते 80 किलो मासळी लागते. अंदाजे दीड ते दोन टन मासळी केवळ हॉटेलचालकांसाठी लागते. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे पुणे ते भिगवण हा प्रवास सव्वा तासांचा बनला आहे. भिगवणहून मासे खाऊन सुमारे तीन ते चार तासांत पुण्यात जाणे शक्य झाले आहे.
टाळेबंदीपूर्वी पुणे शहरासह उपनगरांमधून दररोज 60 ते 80 गाड्यांमधून 300 ते 400 ग्राहक खास मासे खाण्यासाठी भिगवणला येत होते. उपनगरी भागातील तरुणांमध्ये भिगवणच्या माशांची “क्रेझ’ आहे. पुणे ते सोलापूर असा प्रवास करणारा तरूणवर्ग भिगवणच्या मासे थाळीचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही. सध्या साथीमुळे हा ग्राहक येत नसल्याने हॉटेलचालकांनी सांगितले.