ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आवाहन करताच पुरग्रस्तांना भरघोस मदत
बारामती- राज्यातील सांगली, कोल्हापूर भागात पुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी बारामतीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बैठक घेत अर्ध्याच तासात तब्बल एक कोटी रुपयांची रोख मदत उभी केली. विशेष म्हणजे या रोख रक्कमेशिवाय अन्नधान्य, कपडे, औषधांसह गरजेच्या वस्तूही पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पवार यांच्या आवाहनाला बारामतीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पूरग्रस्तांसाठी मदतीबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी अर्ध्याच तासात एक कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली. या रोख रक्कमेशिवाय धान्य, कपडे, औषधे आणि गरजेच्या वस्तूही देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही सर्व मदत येत्या दोन दिवसात सांगली, कोल्हापूरसह विविध भागात पोहोचवली जाणार आहे.
यावेळी शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 25 लाख असे एकूण 50 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीत विविध संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने रोख स्वरुपात मदत देण्याचे जाहीर केले. तर अनेक संस्था आणि व्यक्तींच्या वतीने वेगवेगळ्या वस्तू स्वरूपातील मदत पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे.
बारामतीतून येत्या दोन दिवसात आणखी मदत जमा करुन ती पूरग्रस्तांना पाठवली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.8) कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन या नैसर्गिक आपत्तीसाठी देतील आणि हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
- बारामतीतून सर्वाधिक मदत…
साहेबांच्या हाकेला बारामतीकरांनी नेहमीच साथ दिली आहे आणि यापुढेही देणार. कोणत्याही सामाजिक कामात राजकारण नको, अशी शिकवणच साहेबांची असल्याने अशा मदतकार्यात नेहमीच बारामतीचा पुढकार राहीला आहे. राज्यभरातून सर्वाधिक मदत बारामीतूनच जाणार, असा विश्वास बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव यांनी व्यक्त केला. पुरस्थिती निवळल्यानंतरही बाधीत गावांना बारामतीतून मदत पोहचविण्याकामी आमचे प्रयत्न असतील, असेही सातव यांनी सांगितले. - …स्थिती हाताळण्याचा “साहेबां’ना अनुभव
महाराष्ट्रावर सध्या महापुराचे संकट कोसळले आहे. नैसर्गीक आपत्तीच्या रुपात किल्लारीच्या भुंकपातही असेच संकट कोसळले होते, त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री होते, त्यांनी ती स्थिती मोठ्या कुशलतेने हाताळली होती. यामुळे सरकारने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही याकामी चर्चा करायला हवी, असे पुरग्रस्तांना पाच लाख रूपयांची मदत करणारे माजी नगरसेवक योगेश जगताप यांनी सांगितले.