करोनापाठोपाठ अवकाळीचा प्रचंड फटका : विक्रीचा अंजीर नासू लागला
दिवे- पुरंदर तालुक्यातील अंजीर बागांना सुमारे एक कोटींचा फटका बसला आहे. सध्या करोनाची साथ देशभरात अवतरली असताना त्यापाठोपाठ अवकाळीच्या तडाख्यात बागा सापडल्या आहेत. फोंड्या माळावर अंजीरच्या बागांचे नंदनवन करणाऱ्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवणूक केली आहे. व्रिकीसाठी तयार असलेल्या अंजीरला मागणीच घटली आहे. त्यात हक्काची मुंबईची बाजारपेठ ठप्प असल्यामुळे विक्री कोठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
दिवे आणि सोनोरी परिसरात अंजीर बागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. करोना व्हायरसमुळे गेल्या आठ दिवसांपासून झाडाला लगडलेली फळे आहे. त्या अवस्थेत आहेत. उन्हाळी हंगामात अंजीराचे चार पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडतील, अशी आशा सुरूवातीच्या काळात हंगाम सुरू होताना वाटत होती. बाजारभाव सुद्धा चांगला होता. परंतु नंतर करोणा व्हायरसची बाधा देशात अक्षरशः थैमान घालत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
पुरंदर तालुक्यातील अंजीर देशात प्रसिद्ध आहेत. सध्या मात्र, पहिल्यांदा करोना, त्यानंतर अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे लाखो रुपये केलेली गुंतवणूक मातीमोल झाली आहे.
कोणी अंजीर घेता का अंजीर, असे म्हणण्याची वेळ बागायतदार शेतकऱ्यांवर आली आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अंजीरची विक्री करायची कोठे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अंजीरच्या बागेतील परिपक्व झालेले लालबुंद अंजीर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे फळ आरोग्यास पोषक असताना उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी समस्या उभ्या ठाकल्या आहेत.
राज्य शासनने शेतमाल वाहतुकीस परवानगी दिली आहे. परंतु करोणा व्हायरसने शेतकरी सुद्धा आपला शेतीमाल शहरात घेऊन जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यातच अवकाळीची भर पडली आहे. पुरंदर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे दिवे, सोनोरी परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अंजीरच्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विक्रीयोग्य झालेले अंजीर झाडावरच नासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान होत आहे,
- हक्काची बाजारपेठच ठप्प
पुरंदर तालुक्यात पोषक असलेल्या जमिनीत अंजीरच्या बागा फुलल्या आहेत. उन्हाळी हंगामातील अंजीरच्या बागा यावर्षी चांगल्या बहरल्या आहेत. मात्र, करोनाची बाधा आणि त्यात अवकाळी पावसाची भर आदी कारणांमुळे विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजारपेठच राहिली नाही. जमावबंदीचा फटका बसला आहे. अंजीरला मुंबई, नवी मुंबईची बाजारपेठ आहे. परंतु या शहरात ग्राहकांची मागणी घटली आहे, असे अंजीर उत्पादक शेतकरी सुधीर झेंडे, संदीप झेंडे, बाळासाहेब झेंडे, बबन विष्णू राऊत, तात्या काळे यांनी सांगितले.